बाणडोंगरी डीपी रोड;आमदार अतुल भातखळकर यांची आणखी एक वचनपूर्ती,नागरिकांची हायवेच्या वाहतूक कोंडीतून होणार सुटका.
मुंबई : गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आज बाणडोंगरी डी.पी. रोडच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या रस्त्याच्या कामामुळे कांदिवली ते मालाड आणि मालाड ते कांदिवली ये-जा करणे कमीतकमी वेळेत शक्य होणार असून हा प्रश्न आता कायमचा मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले. बाणडोंगरी डी.पी. रोडच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
आमदार भातखळकर म्हणाले, सुरुवातीपासून हा डी.पी. रोड व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर खूप पाठपुरावा केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित भेटी या कामासाठी घडवून आणल्या. अनेक नियम, कायदा या सगळ्या चौकटीतून या रस्त्याच्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. १८ मीटर रुंद आणि ४५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचा परिसरातील रहिवाशांना खूप फायदा होणार आहे. कांदिवली ते मालाड असेल किंवा मालाड ते कांदिवली असेल नागरिकांना हायवे वरूनच प्रवास करावा लागत होता. आता या डी.पी. रोडमुळे अत्यंत सुटसुटीत, सहज ये-जा करता येणार आहे. यातून वेळेची बचत होणार आहेच शिवाय पेट्रोलचीही बचत होणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार भातखळकर म्हणाले, मुंबई शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे जास्तीत जास्त डी.पी. रोड, सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्वाचे आहे. या रस्त्याचे काम होत असताना स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून रस्त्याचे काम जलद होण्यासाठी मदत होईल. यावेळी पी नॉर्थ विभागाचे वॉर्ड अधिकारी किरण दिघावकर, आरपीआयचे पोपटशेठ धनवट, सर्व माजी नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
WhatsApp Group Join Now
0 Comments